
Monsoon Update : राज्यातील शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना मान्सूनची प्रगती अद्याप मंदावलेली दिसत आहे. हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल म. बंड यांच्या माहितीनुसार, मान्सून सध्या हरनई, सोलापूर आणि हैदराबाद परिसरातच थबकलेला असून त्या भागातही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, २३ जूनपासून मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता निर्माण होत असून महाराष्ट्रात तो काहीसा पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल होत असल्याचे संकेत आहेत.
विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम
२४ जूनपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे व उष्ण राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. यवतमाळसह पूर्व विदर्भात तुरळक पावसाच्या सरींसोबत काही भागांमध्ये उष्णतेची लाटही कायम राहण्याची शक्यता आहे. २५ जूनपासून पावसाची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २५ आणि २६ जूनदरम्यान विदर्भातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे. २५ जूननंतर पावसाचे प्रमाण हळूहळू वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.








